नमस्कार आज आपण दिवाळी सणानंतर साजरा केल्या जाणाऱ्या तुळशी विवाह प्रथेबाबत जाणून घेणार आहोत. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी आणि विष्णू यांचा विवाह करण्यात येतो. प्रथेप्रमाणे कार्तिक शुद्ध एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह करण्यात येतो. हिंदू मान्यतेनुसार तुळशी विवाह कार्तिक पौर्णिमेपासून एकादशीपर्यंत कधीही करता येतो. मराठी रूढी मानकानुसार तुळसी विवाहानंतर चातुर्मास संपतो. प्रत्येक घरामध्ये रोज तुळशी वृंदावना भोवती प्रदक्षिणा घालून तुळशीची पूजा केली जाते. तुळशीला लक्ष्मीचे स्वरूप ही मानले जाते.
तुळसी बद्दल थोडेसे
तुळसी ही एक वनस्पती आहे, या वनस्पतीला भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्व आहे. पुरातन काळापासून प्रत्येक घरासमोर तुळस लावण्याची पद्धत होती, अजूनही प्रत्येक घरापुढे तुळसी वृंदावन असते. तुळस घरासमोर लावण्याचे शास्त्रीय कारणेही आहेत. तुळसीला हिंदू संस्कृतीत पवित्र मानले जाते.
तुळशी वनस्पती भारतातील सर्व भागात आढळते तसेच ही वनस्पती कमी पाण्याच्या आणि अति पर्जन्यमान असणाऱ्या भागातील टिकून राहू शकते. या वनस्पतीला पापनाशी म्हणून ओळखले जाते. अलीकडच्या काळात तुळशीला आयुर्वेदिक आणि वैद्यकीय उपचारांसाठी वापरले जाते.
कृष्णा तुळस, राम तुळस, लवंग तुळस, लक्ष्मी तुळस ही काही वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशीच्या जातींची नावे आहेत. यापैकी काही जाती वैद्यकीय दृष्ट्या खूपच उपयोगी आहेत. तुळशीचा उपयोग सर्दी खोकला, घसा दुखी दात दुखी आणि त्वचेच्या आजारांवर होतो. तुळशीच्या वापराने कोणतेही दुष्परिणाम नसल्यामुळे अगदी बिनधास्तपणे तुळशीचा वापर लहान मुलांच्या आरोग्यासाठी करता येतो.
अशी ही सर्व गुणसंपन्न तुळस वनस्पती प्रत्येक मनुष्याच्या सहवासात असावी म्हणून तर धार्मिक तत्त्ववेत्यांनी तुळशीला महत्त्वाचे स्थान दिले आहे तसेच तुळस प्रत्येक घराच्या दारासमोर लावण्याची पद्धत अवलंबली आहे.